Skip to main content

नवरंग



                         ' निसर्ग म्हणजे विविध रंगांची उधळण' हे काव्यात्मक वाक्य आपण खूप ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं असेल. निसर्गात काही प्राणी, पक्षी, फळ, फुलं ही खास त्यांच्या रंगांसाठी प्रसिद्ध असतात. पण जेव्हा हे सारे रंग एकत्र येतात तेव्हा जे दृश्य असते ते खूपच मनमोहक ठरते. इंद्रधनुष्य, मोरपंख हे सगळं काही आपल्या मनावर बिंबायला हेच सूत्र तर कारणीभूत आहे. पक्षी आणि फुलपाखरं ही तर जणू निसर्गातल्या सगळ्या रंगांचे प्रतिनिधीच भासतात. हिरवा पोपट, काळी मैना अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. यावरूनच पोपटी, मोरपंखी अश्या काही रंगांची नाव प्रचलित झालेली  आहेत. असाच अजून एक पक्ष्यांच्या जगतातील रंगांचा आविष्कार म्हणजेच ' नवरंग '.

घाबरलेल्या अवस्थेत अंगणात असलेला नवरंग

          या पक्ष्याची आठवण होते आणि लिहावस वाटलं त्याच कारण अस की कोल्हापूर शहरात मिळालेलं त्याच अस्तित्व. काही दिवसांपूर्वी मला माझे परिचित श्री. राबाडे यांचा फोन आला. साधारण दुपारचे बारा वाजले असतील. फोनवरून एक वेगळाच पक्षी त्यांच्या घराच्या अंगणात आल्याचे त्यांनी सांगितले. तो उडत नाहीय आणि घाबरून काही दिलेलं खात पित नाहीये काय करावं असं त्यांनी मला विचारलं. आसपास भटकी कुत्री असल्याने ते त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहेत असं त्यांनी सांगितलं. आता फोनवरून सगळच काही ठरवता येत नव्हतं शिवाय नक्की तो पक्षी जखमी आहे की काय झालंय हे पण कळत नव्हतं. मी त्यांना त्याचे फोटो काढून मला पाठवा असे सांगितलं आणि फोटो येण्याची वाट पाहत बसलो. तोपर्यंत मनात काहीच अंदाज बांधता येत नव्हता. 'वेगळा पक्षी म्हणजे नेमके काय असेल? कदाचित एखादा पानपक्षी असेल का?'  आजकाल व्हॉटसअप सारखे साधन असल्याने मी त्यांना वर्णन विचारण्यात वेळ घालवला नाही. तेवढयात मोबाईल टींग झाला आणि काय सांगता! मी तो फोटो पाहताच राहिलो. ज्याचा मूळ अधिवास हा समुद्र किनारी आहे असा नवरंग ( Indian Pitta ) पक्षी चक्क कोल्हापूरमध्ये...कस शक्य आहे? म्हणून पुन्हा फोटो झूम करून पाहिला तर 'अरे होय! हा तर तोच आहे '
           हा साधारण साळुंकीच्या आकाराचा पक्षी असतो. आपला अधिकतर वेळ जमिनीवरच घालवतो. मुख्यत्वे करून छोटे कीटक हे याचे अन्न असते. या पक्षाचे बाह्य वर्णन म्हंटले तर शेपटी कोणीतरी कापून टाकले अशी बोडकीच असते. बारीक लालसर रंगाचे उंच पाय आणि त्यावर टुमदार शरीर. पण या पक्ष्याची खरी ओळख आहे ती याच्या रंगांमुळेच. याच्या रंगांचे वर्णन काय करावे, डोके आणि पोटाकडचा भाग हा पिवळसर असतो. चोचीपासून मानेपर्यंत काळ्या रंगाची पट्टी असते, या पट्टीमध्येच डोळे असतात. डोळ्याभोवती बारीक पांढरी किनार आणि डोक्यावर मधोमध काळ्या रंगाची नाम ओढल्यासरखी नक्षी असते. चोचीच्या खालील भाग पांढरट असतो. पंखाचा रंग हा हिरवा असून शेपटीकडे आतल्या बाजूला निळा रंग असतो जो तो उडताना आपले लक्ष वेधून घेतो. पोटाच्या अर्ध्या भागापासून बुडापर्यंत लालसर नारिंगी रंग असतो. असा देखणा पक्षी आपल्या कोल्हापूरमध्ये दिसतोय हा माझ्यासारख्या निसर्गवेड्या माणसासाठी एक उत्सवच होता. त्याचा मूळ अधिवास समुद्रकिनाऱ्यावर असलेली छोटी झुडपे हा आहे. परंतु कधी कधी तो निर्मनुष्य परिसरातील ओढ्याच्या आसपास असणारी जी झाडी असते तिथे देखील आढळतो. मी पहिल्यांदा हा पक्षी एका संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड नावांच्या समुद्र तटाजवळील किल्ल्यावरील करवंदाच्या जाळीत पहिला होता.
                मला मिळालेल्या माहितीनुसार हा नवरंग उडत नव्हता आणि कदाचित त्याला काही तरी लागलं असावं. कारण त्या परिसरात बरीच भटकी कुत्री आणि मांजर पण होती. त्यामुळे कदाचित तो जखमी पण असू शकतो. या विचाराने वेळ वाया जाऊ नये म्हणून मी त्या परिसरात राहत असलेल्या आमच्या संस्थेचां सभासद काशीफ याला त्या ठिकाणी जाऊन तो पक्षी सुरक्षितपणे पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडवयास सांगितले. काही वेळातच त्याने तो पक्षी त्यांच्या अंगणातून पकडून शहरापासून दूर एका ओढ्याच्या बाजूला झुडुपामध्ये सोडून दिला. तो पक्षी सोडतानाची दृश्य मोबाईलमध्ये कैद करून त्याने मला पाठवली. अगदी खुश होऊन आपल्या घरी परतल्या सारखा तो नवरंग उड्या मारत निघून गेला. हा पक्षी खूपच कमी प्रमाणात शहरात आढळतो. याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे याची शीळ घालण्याची पद्धत. संध्याकाळी अथवा जेव्हा मळभ वातावरण असते तेव्हा एकदम सैन्यातील एखाद्या शिपायाप्रमाणे कमांड सोडावी तशी मान ताठ करून आपले डोके थोडे मागे घेऊन हा शीळ घालतो.

नवरंगला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात सोडताना

               लॉकडाऊनमुळे ध्रुवावर तयार झालेले ओझोनचे छिद्र भरून निघाले, जालंधरवरून हिमालय दिसू लागला, काही वन्यजीव रस्त्यावर फिरू लागले असे कितीतरी निसर्गात होणारे बदल आपण अनुभुवत आहोत. पण या पक्षाच्या दर्शनासारखे खूप काही सूक्ष्म बदल आपल्या आसपास देखील होत आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे. गरज आहे ती केवळ या निसर्गातल्या सुदंर गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची आणि त्यांच्याप्रती संवेदनशील राहण्याची. काही वर्षापूर्वी कोल्हापूरचे पक्षीवैभव हे अमाप होते पण अलीकडे प्रदूषण आणि शहराच्या भोवताली वाढणार बांधकाम यामुळे त्यांच्या संख्येत बरीच घट झालेली आहे. पण या नवरंग पक्षाने दर्शन देऊन थोड संयम बाळगून आपण आपली जीवनशैली बदलली तर नक्कीच बिघडलेला हा निसर्गही मानवी प्रयत्नाने पूर्वरत होऊ शकतो अशी आशाच दाखवली आहे.


- Chetan Kokatnur
    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...